मगधीरा

|


काजल अगरवाल हिच्यावरती आजकाल आमचा भारी जीव. तिच्यावरती चित्रित केलेले मगधीरा मधील ' धीर धीर..' हे आमचे अत्यंत आवडते असे गाणे. ह्या मगधीरा चित्रपटाबद्दल खूप ऐकले होते, खरेतर हा एकदा पाहिला देखील होता. मात्र सबटायटल्स नसल्याने शष्प काही कळले नव्हते. चार दिवसांपूर्वी सबटायटल्स सकट ह्या चित्रपटाची प्रिंट मिळाली आणि दिल एकदम गार्डन गार्डन झाले. ह्या एका नितांत सुंदर चित्रपटाची ही ओळख.



मगधीरा म्हणजे शूर, धैर्यवान. हा चित्रपट फ्लॅशबॅक आणि वर्तमान अशा दोन्ही काळात वावरणारा असला तरी दोन्ही काळांचा सुंदर संगम साधलेला असल्याने इतर फ्लॅशबॅक चित्रपटांसारखा कंटाळवाणा होत नाही. चित्रपटाची कथा सुरू होते ४०० वर्षापूर्वीच्या काळापासून. चित्रपटाच्या सुरुवातीलाच कड्यांवरून पडून जखमी काजल अगरवाल मृत्युमुखी पडताना दिसते, मृत्यूपूर्वी तिने कोणा भैरवाकडे (राम चरण तेजा) प्रेमाची मागितलेली कबुली आणि तिच्या मागोमाग त्याने देखील मारलेली उडी अशा दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. ह्या दोघांच्या मृत्यूनंतर त्याच कड्यांवरती शेरखान (श्री हरी रघुमुंद्री) भैरव परत जन्म घेणार आणि आपले ह्या जन्मात अपुरे राहिलेले प्रेम प्राप्त करणार अशी गर्जना करताना दिसतो आणि आपल्याला पुढचा अंदाज यायला लागतो.

आता एकदम वर्तमानाकडे चित्रपट वळतो. पूर्वजन्मीचा भैरव आता हर्षा म्हणून जन्माला आलेला असतो. बाइक रेसींग, स्टंट हे त्याच्या उपजीविकेचे साधन. तर पूर्वीची युवराज्ञी मित्रविंदा अर्थात काजल अगरवालने इंदू म्हणून जन्म घेतलेला आहे. एका पावसाळी दिवशी रिक्षाने जात असताना हर्षाचा स्पर्श इंदूच्या हाताला होतो आणि त्याला गतजन्मीच्या काही गोष्टी दिसतात. ह्या धक्क्याने हादरलेला हर्षा आता इंदूचा शोध घ्यायला रिक्षा सोडून धावतो. काजल अगरवाल त्याच्या शोधामागचे नक्की सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्याला आपण इंदूची मैत्रीण असल्याचे खोटेच सांगते आणि त्यांची गाठ घालून देण्याचे वचन देते. इकडे चालबाज हर्षा देखील आपण इंदूला ओळखतो, तिचे आणि आपले प्रेम आहे मात्र तिचा बाप ह्याच्या विरुद्ध आहे असे खोटेच सांगतो. आता सुरू होतो तो इंदूला भेटवण्याचा आणि दर वेळी तो फसण्याचा खेळ.



इंदूचे वडील इकडे आपल्या पूर्वजांच्या उदयगढ ह्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयीन लढा देत असतात, ज्यावर त्यांच्या मेव्हण्याने कब्जा केलेला असतो. ह्या मेव्हण्याचा मुलगा रघुवीर (देव गील) इंदूला पाहताच तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्या प्राप्तीसाठी वेळेला स्वतःचा वडलांचा देखील खून करायला मागे पुढे पाहतं नाही. आता इंदू आणि प्रॉपर्टी दोन्ही मिळवायचा तो निश्चय करतो. त्याचा गुरु घोरा मात्र त्याला सावध करतो, की जोवर हर्षा जिवंत आहे तोवर तो इंदूला कधीच मिळवू शकणार नाही. त्यानंतर घोरा त्याला त्याच्या पूर्वजन्मीची हकिगत सांगतो. इकडे इंदू मात्र हर्षाच्या प्रेमात बुडलेली असते. आता तो इंदू आणि तिच्या वडलांची क्षमा मागून त्यांना आपल्याकडे घेऊन येतो. हर्षाच्या प्रेमात बुडलेल्या इंदूच्या प्रेमाला आधी तिचे वडील विरोध करतात, मात्र नंतर त्याला मान्यता देण्याचा निश्चय करतात. त्यांचा हा बदलता निर्णय पाहून रघुवीर त्यांचा खून करतो आणि आळ हर्षावरती आणतो. परिस्थिती देखील अशी येते की हर्षाच खुनी असल्याचा इंदूचा ठाम विश्वास बसतो.
रघुवीर आता इंदूला आपल्याबरोबर उदयगढला नेण्याचा निर्णय घेतो, त्याचवेळी हर्षा आपले निर्दोषत्व सांगायला तिथे पोचतो. बर्‍याच हाणामारीनंतर हेलीक्रॉप्टरला लटकलेल्या हर्षाला इंदूचा पुन्हा स्पर्श होतो आणि एक झटका बसून तो थेट खाली तळ्यात कोसळतो.



आता ह्यावेळी आपला संपूर्ण पुनर्जन्म त्याला आठवतो. आता चित्रपट थेट ४०० वर्षे मागे १६०० सालात जाऊन पोचतो. उदयगढ च्या राज्याची मित्रविंदा (वर्तमानातली इंदू) ही एकुलती एक कन्या. तिचा भावी पती म्हणून रणदेव भिल्ल (अर्थात वर्तमानातला रघुवीर) कडे पाहिले जात असते. मित्रविंदा मात्र मनातल्या मनात भैरव (वर्तमानातील हर्षा) वरती प्रेम करत असते. ह्या भैरवाच्या अनेक पिढ्यांनी उदयगढ साठी आपले प्राण त्यागलेले असतात. त्याच्या वंशातील योद्ध्यांना एक शाप असतो, १०० शत्रू मारल्याशिवाय ते रणांगणात देह ठेवणार नाहीत आणि ३० वर्षाच्या वरती कोणी जगणार नाही.
मित्रविंदाच्या प्राप्तीसाठी ठेवलेल्या पणात रणदेव भिल्ल आणि भैरव दोघेही भाग घेतात. रणदेवाच्या वर्तणुकीने आधीच चिडलेली मित्रविंदा ह्या पणात जो हरेल त्याला बहिष्कृत करून राज्याबाहेर काढले जाईल असेही सुनावते. राज्याच्या आणि मित्रविंदेच्या लालसेने पछाडलेला रणदेव अनेक कॢप्त्या करतो मात्र शेवटी भैरवच जिंकतो. अर्थातच रणदेवाला राज्याबाहेर हाकलले जाते. भैरवच्या वंशाला असलेल्या शापाची माहिती असल्याने राजा भैरवला मित्रविंदाच्या प्राप्तीचा ध्यास सोडण्याची आणि प्रेमाचे त्याग करण्याची विनंती करतो, जी जड मनाने भैरव स्वीकारतो. मित्रविंदा मात्र कोसळून पडते.

इकडे राज्यावरती शेरखान ह्या हिंदुस्थान प्राप्तीच्या ध्येयाने पछाडलेल्या योद्ध्याचे सावट आदळते. त्यातच अपमानित झालेला रणदेव भिल्ल शेरखानशी हात मिळवतो आणि राजाचा खून करून राज्य ताब्यात घेतो. शंकराच्या पूजेसाठी गेलेले मित्रविंदा आणि भैरव मात्र बचावतात. आता शेरखानच्या फौजेसह रणदेव त्यांच्यावरती चाल करून जातो. भैरवाच्या शौर्याचे किस्से ऐकलेला शेरखान त्याला आव्हान देतो आणि १०० सैनिकांची तुकडी त्याच्या एकट्यावरती हल्ला करायला पाठवतो. भैरव त्या सर्व सैनिकांना कंठस्नान घालतो. त्याच्या पराक्रमाने स्तब्ध झालेला शेरखानदेखील त्याच्यापुढे आदराने झुकतो. रणदेव मात्र ह्यासर्वाला तयार नसतो. शेवटी त्याचा व भैरवच्या अंतिम युद्धात भैरव त्याला ठार मारतो, मात्र मरता मरता रणदेव मित्रविंदाला चाकूने प्राणघातक जखम करूनच प्राण सोडतो.



चित्रपट पुन्हा वर्तमानकाळाकडे वळतो. पाण्यात बुडलेल्या हर्षाला आता पूर्वजन्मीचा शेरखान आणि ह्या जन्मीचा सोलोमन हा कोळी वाचवतो. त्याच्या मदतीनेच आता इंदू अर्थात मित्रविंदाला मिळवण्यासाठी हर्षा सज्ज होतो. मग जे काय टिपिकल साऊथ स्टाइल घडत जाते ते पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे.



कुठेही उगाच भावनांना हात घालण्याचा न केलेला प्रयत्न, अप्रतिम संगीत, भव्य आणि अप्रतिम सेट्स, सुंदर लोकेशन्स, झकास गाणी आणि कोरीओग्राफी, प्रत्येक फ्रेम मध्ये दिग्दर्शकाबरोबरच जाणवणारे कॅमेरामनचे टीम वर्क, आणि त्याला लाभलेली सर्वच कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाची साथ ह्या सगळ्याचा जुळून आलेला योग म्हणजे मगधीरा. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने अनेक अ‍ॅवॉर्डस मिळवले. लक्ष्मी आणि सरस्वती अशा दोघींचा वरदहस्त ह्या चित्रपटाला लाभला. लवकरच ह्या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील येणार असल्याची चर्चा आहे.

शटर

|
1

मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट. ह्या चित्रपटात देखील रक्तपात, हिडीस चेहरे ह्याचा समावेश नाही, मात्र चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम आपल्याला खिळवून ठेवते.



टन हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असतो. तो आणि त्याची गर्लफ्रेंड जेन एकदा पार्टीवरून परत येत असताना, जेनच्या हातून एक अपघात घडतो. ती आपल्या गाडीने एका तरुण मुलीला उडवते. गाडीबाहेर जाऊन तिला मदत करण्याच्या विचारात असलेल्या जेनला टन थांबवतो आणि त्या तरुणीला तसेच रस्त्यात सोडून दोघे निघून जातात. इथून खर्‍या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.

2

ह्या प्रसंगानंतर एकाएकी अनेक चमत्कारिक घटना घडू लागतात. सतत आपल्या भोवती कोणीतरी वावरत आहे असे दोघांना वाटत असते. त्यातच टनने काढलेल्या प्रत्येक फोटो मध्ये एक धुरकट आकृती दिसायला लागते. कधी धुरकट सावलीच्या रूपात, तर कधी चेहर्‍याचा रूपात. प्रथमतः टनला हा कॅमेर्‍याचा प्रॉब्लेम वाटतो, मात्र तसे काहीच निष्पन्न होत नाही. इकडे जेन मात्र आपण ज्या मुलीला उडवले त्या मुलीचा आत्माच हे सगळे करत आहे ह्या निष्कर्षावर पोहोचते. टनला मात्र हे सगळे अमान्य असते.

3

टनच्या मित्रांना देखील आता विचित्र अनुभव यायला लागतात. टनला देखील अचानक मानदुखीचा त्रास सुरू झालेला असतो, त्याचे वजनकाटा देखील त्याचे वजन विचित्र दाखवायला लागलेला असतो. शेवटी जेन त्या अपघातग्रस्त तरुणीचा शोध सुरू करते. तपासात जेनला त्या मुलीचे नाव नात्रे असल्याचे आणि ती आणि टन व त्याच्या मित्रांचा ग्रुप कधीकाळी एकाच कॉलेजात शिकत असल्याचे समोर येते. आता मात्र टनला सत्य सांगण्याशिवाय पर्याय उरत नाही. कधी काळी त्याचे आणि नात्रेचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नाते तोडल्यावर ते दु:ख सहन न होऊन नात्रेने आत्महत्या केल्याचे टन कबूल करतो. इकडे टनचा एक मित्र नात्रेच्या आत्म्याच्या भितीने आत्महत्या करतो. आता पुढचा नंबर आपलाच असल्याची त्याची खात्री पटते.

ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्यानेच आता जेन आणि टन दोघेही नात्रेच्या आईला जाऊन भेटता. तिथे गेल्यावर नात्रेने कशी आत्महत्या केली हे त्यांना कळते, मात्र नात्रेची आई तिचा मृत्यू मान्य करायलाच तयार नसते. तिने आपल्या मुलीचे प्रेत अर्थात सांगाडा तिच्या बेडरूम मध्ये जतन करून ठेवलेला असतो. त्याच रात्री हॉटेलात उतरलेल्या टन आणी जेनवरती नत्रेचा आत्मा हल्ला करतो, ज्यात टन जखमी होतो. अथक प्रयत्नांनी दोघेही तिच्या आईला समजवतात आणि शेवटी नात्रेची विधिपूर्वक विल्हेवाट लावली जाते.

4

आता सर्व काही सुरळीत होईल ह्या आशेनं परतलेल्या जेनला काही फोटो मिळतात, जे नात्रेचे टनच्या फ्लॅट मधील अस्तित्व दाखवत असतात. फोटोंचा माग घेत असतानाच एका जेनच्या हातात एका बुकशेल्फ मध्ये लपवलेल्या काही जुन्या निगेटिव्ह्ज लागतात. त्या डेव्हलप केल्यानंतर एक भयानक रहस्यच जेनच्या समोर येते आणि चित्रपटाला वेगळेच वळण लागते. हे रहस्य काय असते ? टन आणि त्याच्या मित्रांच्या जीवावर नात्रेचा आत्मा का उठलेला असतो ? हे सगळे शोधायचे तर शटर पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणि हो हे सर्व सोडाच पण 'टनला नक्की मानदुखीचा त्रास कशाने होत असतो' ह्या एकमेव प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तरी शटर पाहाच पहा.

5

शटरचा त्याच नावाने २००८ साली अमेरिकन रीमेक देखील आलेला आहे, तर हिंदीत तो क्लिक नावाने आला होता. मी तरी तुम्हाला 'ओरिगिनल' शटरच बघण्याचा सल्ला देईन. अर्थात जालावर त्याचे सबटायटल्स सहजपणे उपलब्ध आहेतच. एका वेगळ्या प्रकारचा हॉरर चित्रपट बघायची इच्छा असेल आणि मिनिटा मिनिटाला नवनवे धक्के बसणे आवडत असेल तर शटरला पर्याय नाही.

हा संपूर्ण चित्रपट आंतरजालावर फुकट उपलब्ध आहे.

!! मोरया !!

|


बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या. किरकोळ बदल सोडता अवधूत गुप्ते ह्यांनी झेंडाचीच टीम इथे उतरवलेली आहे.

कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी जबाबदारी सचिन दरेकर ह्यांनी सांभाळलेली असून, अतुल कांबळे आणि अवधूत गुप्ते ह्यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. दिग्दर्शन म्हणून पुन्हा एकदा अवधूत गुप्तेच आहेत. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, संतोष जुवेकर, मेघना एरंडे, धनश्री कोरेगावकर अशी तरुण आणि अभिनयसंपन्न स्टारकास्ट आहे. अर्थात ह्यातील परी तेलंग व मेघना एरंडे ह्यांच्या भूमिका प्रमुख भूमिका म्हणून का गणल्या गेल्या आहेत हा मोठा प्रश्नच आहे.


गणेशोत्सव, त्याचे पावित्र्य, गणेशाच्या उत्सवात शिरकाव करून बसलेल्या वाईट प्रथा, गणेशोत्सवाच्या आधारे चालवले जाणारे राजकारण आणि एकूण राजकारण्यांची प्रवृत्ती अशा सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न म्हणजे 'मोरया' हा चित्रपट. कथेच्या जोडीला चाळीचे बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही.

समोरासमोर परंतु एकाच जागेत असलेल्या गणेश चाळ व खटाव चाळ ह्या दोन चाळी. दोन्ही चाळींचे गणपती वेगळे, इतर सणवारही वेगवेगळे साजरे होणारे. लवकरच तिथे विकसन होणार असल्याने, बिल्डरने एकाच गणपतीसाठी मंदिराची सोय करण्याचे कबूल केले आहे. आता एकाच गणपतीची स्थापना ह्यापुढे दरवर्षी करायचे चाळकरी ठरवतात. दोन्ही चाळीतल्या तरुणांना मात्र हे मान्य नाही. एका चाळीच्या तरुणांचा नेता आहे चिन्मय मांडलेकर तर दुसर्‍या चाळीचा अर्थातच संतोष जुवेकर. ह्या दोन्ही चाळीतला शहाणा मनुष्य म्हणजे दिलीप प्रभावळकर. अर्थात दोन्ही गट त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. शेवटी ह्या वर्षी ज्या गटाचा गणपती जास्ती गर्दी खेचेल, जास्ती प्रसिद्धी मिळवेल तो टिकेल असा ठराव होतो आणि दोन्ही गट जीव तोडून मेहनतीला लागतात.




आता आपलाच गणपती टिकला पाहिजे ह्या ईर्ष्येने दोन्ही गट पेटून उठल्याने मग मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोला करण्याची चढाओढ सुरू होते. वेळेप्रसंगी मग त्यासाठी एका गटाकडून राजकारण्यांचा आसरा घेतला जातो तर एका गटाकडून चक्क मुसलमान मालक असलेल्या यात्रा कंपनीचे पोस्टर मांडवाबाहेर झळकवले जाते. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाही नाही त्या मार्गांचे अवलंब करायला दोन्ही गट सुरुवात करतात. मग आपला गणपती नवसाला पावतो अशी संतोष जुवेकरच्या गटाने चॅनेलवरती खोटी जाहीरात करताच, चिन्मय मांडलेकरच्या गटाकडून त्यांनी लावलेले मुसलमानी पोस्टर आणि त्यांचा गणेशोत्सव कसा सर्वधर्म समभाव निर्माण करणारा आहे ह्याची जाहिरातबाजी केली जाते. त्याच वेळी चिन्मय मांडलेकर हा खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून अवधूत गुप्ते आपल्याला छान चक्कर आणतो. डोक्याला हात मारून पुढे काय घडते ते बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसते.



मग उरलेल्या काळात बाप्पासाठी कार्यकर्ते कशी जीवतोड मेहनत घेतात, संतोष जुवेकर सारखे तडफदार [?] तरुण रजा मिळाली नाही तर नोकरी वरती लाथ कशी मारतात, दहा दिवस कार्यकर्ते बाप्पासाठी दारूचा त्याग कसा करतात इ. इ. आपण नेहमी वाचत असलेले आणि बघत असलेले प्रसंगच साकार होतात. त्यामुळे मधल्या वेळात थोडीशी डुलकी घेतली तरी चालेल.

हान तरा आता सरळ मार्गाने पुरेसे यश काही मिळत नाही म्हणल्यावरती दोन्ही गटाकडून गैरमार्गाचा वापर केला जातो. अर्थात त्याला पाठिंबा असतो तो राजकारण्यांचाच. एका गटाकडून दुसर्‍या गटाच्या मांडवामागे दारूच्या बाटल्यांचा ढीग ठेवला जातो आणि त्याचे चित्रीकरण करून चॅनेलवरती दाखवले जाते. अर्थात मग दुसर्‍या गटाकडून विरुद्ध गटाच्या मांडवाबाहेर लावलेल्या हिरव्या पोस्टरचे नुकसान केले जाते. ही घटना घडते आणि ताबडतोब शहरात दंगली उसळतात. मग दोन्ही धर्माचे राजकारणी त्याचा येणार्‍या निवडणूकीत कसा वापर करता येईल त्याच्या हिकमती लढवायला लागतात. शेवटी काय होते ? खरा गुन्हेगार सापडतो ? दोन्ही गटांना आपली चूक लक्षात येते ? आणि शेवटी गणपती कुठल्या गटाचा राहतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर 'मोरया' दर्शाना शिवाय पर्याय नाही. अर्थात आजकालच्या तुम्हा जाणकार मंडळींना असे प्रश्न पडतील असे वाटत नाही. ह्याची उत्तरे चित्रपट न बघताच तुम्हाला कळले देखील असतील.



बरं आता चित्रपटाचे येवढे पोस्टमार्टेम केल्यावर, चित्रपटात काही चांगले आढळलेच नाही का ? नक्की आढळले. स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर ह्या तरुणांचा अभिनय, त्यांचे लुक्स, त्यांची संवादफेक, कॅमेर्‍याचे ज्ञान सगळे सगळे आवडले. चित्रपटाचे चित्रीकरण, वापरलेले लोकेशन्स देखील झकास. शीर्षक गीत, दहीहंडी नृत्य देखील झकास जमले आहे. मात्र दिलीप प्रभावळकर ह्यांना अशी आगा पिच्छा नसलेली आणि जणूकाही समोपदेशकाच्या थाटाची भूमिका देऊन वाया का घालवले आहे ते कळत नाही. परी तेलंग, मेघना एरंडे ह्या देखील चॅनेल्सच्या निवेदकांच्या भूमिकेत छाप पाडू शकलेल्या नाहीत. अर्थात भूमिका मध्येच काही दम नसल्याने त्यांना दोष का द्यावा ? मुळात ह्या दोन चाळीतल्या गणेशोत्सवा शिवाय जगात काही घडतच नाहीये अशा ठाम मानसिकतेने ही चॅनेल्स चाळीतच ठाण मांडून का बसलेली असतात ते बाप्पालाच ठाऊक.



राकारण्याच्या भूमिकेत इथे पुन्हा एकदा ३/४ प्रसंगात पुष्कर श्रोत्री दर्शन देतो. त्याची भूमिकाच उद्धव ठाकरे टाईप लिहिली आहे, का तो अजून झेंडाच्या मानसिकतेतून बाहेरच पडू शकलेला नाही ते कळत नाही. चित्रपटात मध्येच एक मुसलमान नेता कम बिझनेसमनचे पात्र घुसडलेले आहे. कुठल्याच पात्राला एक ठाम अशी विचारधारा किंवा ज्याला ग्राउंड म्हणावे ते पुरवले गेलेले नाही. कुठलेच पात्र ठसठशीत झालेले नाही. स्पृहा जोशी फक्त गायला मिळते, गळ्याचा कस वगैरे लागतो म्हणून डान्सबार मध्ये गात असते हे तर पटता पटत नाही. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर हे पोटापाण्यासाठी, रोज रात्री दारू पिण्यासाठी पैसे कुठून आणतात हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या बुद्धिसामर्थ्यावर सोडवावा.
एकुणात काय तर एकाच चित्रपटात सगळेच काही दाखवण्याचा अवधूत गुप्तेंचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

Acacia

|


हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.



डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य. आपल्या वडिलांच्या मदतीने शेवटी एकदा डॉक्टर किम आपल्या पत्नीला मूल दत्तक घेण्यासाठी राजी करतो आणि ह्या चित्रपटाला सुरुवात होते. कलेची आवड असणारी मी-सूक जिन्साँग ह्या सतत चित्रे काढण्याची आवड असणार्‍या अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेते. जिन्साँगच्या घरी येण्याने ह्या कुटुंबाच्या एका नव्याच आयुष्याला सुरुवात होते.



अतिशय अबोल आणि सतत झाडांचीच चित्रे काढण्यात मग्न असणारा जिन्सॉंग आपल्या सभोवताली कायमच एक गूढ वलय बाळगून असतो. काही दिवसातच जिन्साँग समोरच्या घरात राहणार्‍या मिन्जी ह्या लहान मुलीकडे आणि त्याच्या घराच्या बागेत असलेल्या एका वठलेल्या अ‍ॅकेशिआ वृक्षाकडे आकर्षित होतो. ते झाड म्हणजे आपली मेलेली आई असल्याचे जिन्सॉंगचे ठाम मत असते. मिन्जीच्या संगतीत काहीसा अबोल असणारा जिन्साँग थोडाफार बोलका तर बनतोच पण काहीसा दुराग्रही आणि हट्टी देखील बनायला लागतो. त्यातच मी-सूक ला दिवस जातात आणि सगळे चित्रच बदलते.



आपली आई आता नव्या बाळाची आई होणार ह्या कल्पनेने आधीच हट्टी असलेला जिन्साँग फारच दुराग्रही बनून जातो. त्यातच मुलीच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून हजर झालेली मी-सूक ची आई तिला जिन्साँगला परत अनाथाश्रमात पाठवायचा सल्ला देते. मी-सूक मात्र त्याला तयार होत नाही. बाळाच्या जन्मानंतर मात्र जिन्साँगचे वागणे एकदमच खुनशी होऊन जाते आणि सगळे कुटुंबच दचकते. जिन्साँगला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करणारी मी-सूक देखील आता त्याच्याशी प्रेमाने वागेनाशी होते. अशा काजळलेल्या वातावरणात एका पावसाळी रात्री जिन्साँग अचानक नाहीसा होतो आणि संपूर्ण कथेला एक वेगळेच वळण लागते.



जिन्साँगच्या जाण्याने एकटी पटलेली छोटी मिन्जी आता सतत आपला वेळ त्या वठलेल्या अकॅशिआ वृक्षाच्या सानिध्यातच घालवायला लागते. त्या झाडातून जिन्साँग तिच्याशी बोलतो असे ती सांगायला लागते आणि सगळे दचकतात. त्यातच अचानक जिन्साँग नाहीसा झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटायला सुरुवात होते. काही दिवसातच तो वृक्ष चांगलाच बहरतो आणि एकेदिवशी त्या वृक्षाकडून त्याच्या परिघात येणार्‍या जिन्साँगच्या दत्तक कुटुंबावर फांद्या आणि मुंग्यांच्या साहाय्याने जीवघेणे हल्ले सुरू होतात. ह्या अचानक घडू लागलेल्या अनैसर्गिक घटनांनी संपूर्ण कुटुंबच थरारून उठते. आणि मग एक दिवशी अचानक सगळ्या रहस्यावरचा पडदा उघडतो आणि आपण प्रेक्षक सुन्न होऊन जातो.



जिन्साँगच्या बाबतीत नेमके काय घडलेले असते ? तो परत येतो ? अ‍कॅशिआ आणि जिन्साँगचे नक्की नाते काय असते ? मिन्जी जे सांगत असते ते खरे असते का ? ह्या अशा रहस्यमयी प्रश्नांनी सोडवणूक आणि तो सुटतानाचा थरार पडद्यावर बघण्यातच खरी मजा आहे. चित्रपट कोरिअन असला तरी इंग्रजी सबटायटल्स सकट तो उपलब्ध असल्याने निराशा होण्याचे कारण नाही. कुठेही रक्तपात, माणसे कापाकापीची दृश्ये, ओंगळावाणी भुते, विचित्र आणि कर्कश संगीत ह्याची जोड न घेता देखील तुम्हाला रहस्यमयी वातावरणात कसे खिळवून ठेवले जाते ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. अनेक दृश्यात संवाद कमी आणि कॅमेर्‍याचा वापर जास्ती करून दिग्दर्शक आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो. दिग्दर्शन, कथा आणि अभिनय सर्वच अंगाने सुरेख असलेला हा चित्रपट पाहायलाच हवा.

रागिणी MMS

|


काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे. खरे सांगायचे तर चित्रपट सुरु झाल्यापासून हळूहळू आता हा सॉफ्ट पॉर्न कडे झुकतो का काय? असाच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मध्यांतरानंतर तर चित्रपटाला ताण ताण ताणले आहे आणी तिथेच सगळी मजा निघून जाते.



रागिणीचा (कैनाझ मोतीवाला) मित्र उदय (राजकुमार यादव) तीला विकेंडसाठी शहराबाहेरच्या एका फार्महाऊस वरती घेऊन जातो. हे फार्महाऊस जंगलात असते. रागिणी आनंदात असते मात्र उदयच्या मनात काही वेगळेच विचार असतात. ऍक्टर व्हायची स्वप्ने बघणारा उदय आपल्या मित्र पंडित ह्याच्या साहाय्याने त्या फार्महाऊस मध्ये रागिणीची सेक्सटेप चित्रित करणार असतो. रागिणी मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असते.
इकडे बंगल्यात शिरल्या शिरल्याच आधी लाइट नसल्याचे कळते मग उदय एका अडगळीच्या आणि अंधार्‍या बोळातल्या खोलीत जाऊन स्विच शोधतो. त्याच खोलीत त्याला मॉनिटरवरती त्याच्या मित्राने संपूर्ण फार्महाऊसमध्ये विविध ठिकाणी लपवलेले कॅमेरे दिसतात. आनंदलेला उदय हॉल मध्ये येतो आणि ताबडतोब त्याच्या प्रेमचाळ्यांना ऊत येतो. रागिणी मात्र 'भूक लागलीये म्हणून ओरडत असते.' मग पॅक करून आणलेला डबा बाहेर काढला जातो ज्यात अचानक आळ्या निघतात. (हे राम !) मग शेवटी ते अन्न फेकून देण्यात येते. तोवर बरीच रात्र झालेली असल्याने आता दोघेही वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे मोर्चा वळवतात. (इथे प्रेक्षकही सावरून बसतात)



बाथरुम मध्ये रागिणी फ्रेश होईपर्यंत इकडे उदय टीव्ही मध्ये लपवलेल्या कॅमेर्‍याची सेटिंग वैग्रे अ‍ॅडजेस्ट करून घेतो. रागिणी बाहेर आल्यावर पुन्हा प्रेमचाळ्याना ऊत येतो... पण ह्या वेळी बंगल्याच्या दारावर थापा ऐकायला येऊन लागतात आणि पुन्हा आपल्या आणि उदयच्या रंग मे भंग होतो. हिलस्टेशनला निघालेले रागिणीचे मित्र पिया आणि उदय जाता जाता तिला भेटायला आलेले असतात. नुसते आलेले नसतात तर बिअर वैग्रे घेऊन पार्टिच्या तयारीनेच आलेले असतात. आता उदयची चिडचिड चालू होते, मात्र रागिणी त्याची समजूत काढते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच उदयला बंगल्याच काहीतरी विचित्र जाणवते, आसपास कोणीतरी वावरत आहे असे वाटायला लागते. त्याच्या मानेवर अचानक वार देखील होतो. गावात कोणीतरी सांगितलेली त्या बंगल्यातल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या बाईला चेटकीण म्हणून मारल्याची आणि तिच इथे वावरत असल्याची गोष्ट त्याला आठवते. ती गोष्ट तो सगळ्यांना सांगून पियाला घेऊन तिथून पळ काढतो.
आता सगळी आवरा आवर करून पुन्हा उदय आणि रागिणी बेडरूम मध्ये (पुन्हा प्रेक्षकांच्या आशा पल्लवित) जातात. पुन्हा त्यांच्या प्रेमप्रदर्शनाला उत येतो. ह्यावेळी उदय रागिणीचे हात बेड्यांनी बेडला बांधतो आणि प्रेमाचा नवाच आविष्कार दाखवतो. त्यांचे प्रेम रंगात आलेले असतानाच उदयचे केस धरून त्याल कोणीतरी ओढते आणि दोघांचा थरकाप उडतो. त्या दोघांशिवाय अजून कोणीतरी आणि ते ही अमानवीय अस्तित्व आजूबाजूला वावरत आहे ह्याची त्यांना जाणीव होते. ह्यासर्वात बेड्यांची किल्ली हरवते, मोबाईलची बॅटरी संपते आणि शेवटी उदय झपाटला जातो आणि आत्महत्या करतो. आता उरते ते बेड्यांमध्ये हात अडकलेली असाहाय्य रागिणी आणि ते अस्तित्व...



पुढे काय होते ते चित्रपटातच बघण्यात खरी रंगत आहे. आता ती प्रत्येकालाच रंगत वाटेल असा माझा दावा नाही. चित्रपटातले अमानवीय अस्तित्व हे एका सो कॉल्ड चेटकिणीचे दाखवले असून ते मराठी भाषिक दाखवली आहे हे रहस्य उघड करायला हरकत नाही. तीचे 'मी चेटकीण नाही... मी माझ्या मुलांना मारले नाही..' चे पालुपद मात्र असह्य. खरे सांगायचे तर कैनाझचा एकूण मादक लुक आणि बोल्ड दृश्यात देखील तिने न लाजता दिलेली साथ ह्यासाठी सुद्धा हा चित्रपट बघायला हरकत नाही. हो..उगा ताकाला जाऊन भांडे का लपवा ? ती दिसली आहे मादक आणि अभिनय देखील बराच चांगला केला आहे. राजकुमार यादव देखील ठीकठाकच, मात्र त्याची घाबरल्याचा जो अभिनय केला आहे ना तो का कुणास ठावुक खदखदून हसवून जातो आपल्याला.


तर सांगायचा मुद्दा काय तर थरारपटाची म्हणून फार मोठी अपेक्ष न ठेवता नव्या चेहर्‍यांचा टैमपास चित्रपट म्हणून हा बघायला नक्कीच हरकत नाही.

रेडी ? नो रेडी ssSSsss ...

|


वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती. (इथे 'अपेक्षा उंचावली होती' असे म्हणालेले नाही ह्याची नोंद घेतल्या जावी.) अगदी फुल्ल्टू धमाल नसेल पण निदान दोन अडीच तास जो काय चित्रपटाचा कालावधी असेल तो झकास जाईल ह्या कल्पनेने रेडीला हजेरी लावली.



सलमान, असीन, परेश रावल, पुनीत इस्सर, मनोज जोशी हे शिलेदार, महेश मांजरेकर, आर्य बब्बर, अनुराधा पटेल हे सैनिक आणि पाहुण्या भूमिकेत संजु बाबा, चंकी पांडे, आरबाज खान, अजय देवगण आणि झरीन खान अशी फौज असताना मस्त झणझणीत भेळेचा बकाणा भरायला मिळणार ह्या आशेने आम्ही स्थानापन्न झालो. खरंच सांगतो तुम्हाला चित्रपट सुरु झाल्यापासून १५ व्या मिनिटाला आम्ही 'चित्रपटालाच नाही तर पृथ्वीवरच का आलो ?' असा प्रश्न स्वतःला विचाराण्यायेवढे निराश आणि हताश झालो.

खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे. आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल. सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार, म्हणजे खरेतर १०/१२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी. पटकथा = कथाच नाही हो., पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे. आणि सलमान तर असह्यच होतो. देव आनंद.. अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःचा चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर सलमानवर केंद्रित आहे. (मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे.)

बरं आता तुम्हाला स्टोरी सांगायची म्हणली तर ती चार ओळीत देखील मावायची बोंबाबोंब. सलमान एक 'मासूम चेहरेवाला कमींना' असतो आणि त्याचा बाप महेश मांजरेकर हा करोडपती असतो आणि विनाकारण विनोद निर्मितीसाठी तो विसराळू देखील असतो. तो नक्की काय धंदा करत असतो हा भाग अलाहिदा. तर ह्या सलमानचा एक भरापुरा परिवार असतो. २ काका , २ काकवा, २ नोकराणी, एक कुत्री इ. इ. कुटुंबाचे एक गुरुजी देखील असतात, ज्यांच्या सल्ल्यानेच घरातली काडी इकडची तिकडे हालत असते. हे गुरुजी सलमान अर्थात प्रेम साठी पूजा नावाची एक कन्या निश्चित करतात आणि तीला एयरपोर्ट वरून आणायची जबाबदारी अर्थात प्रेमवर येते. मग साहेब मुद्दामून वेगळ्याच टर्मिनलवर जाऊन उभे राहतात आणि पूजा विषयी काकाशी गप्पा मारत बसतात. इकडे स्वतःचे लग्न मान्य नसल्याने पळून आलेली आणि माफिया कुटुंबाशी निगडित असलेली असीन अर्थात संजना ह्याचे बोलणे ऐकते आणि पूजा असल्याचा बनाव करून प्रेमच्या घरात आश्रय घेते.



मग सलमानचे असीन वर आणि असीनचे सलमानवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न अ‍ॅज युज्वल सुरु होतात. मग अचानक सलमानला असीनच्या सच्चाईचा पत्ता वैग्रे लागतो आणि मग लवकरच दोघांना आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार देखील होतो. मग हळूहळू संजनाच्या कुटुंबाची ओळख होते. तीचे दोन्ही मामा तिच्या २०० करोड रुपायाच्या फॅमिलीसाठी तीचे लग्न आपापल्या साल्यांबरोबर लावायच्या तयारीत असतात. हे दोन्ही मामा सख्खे भाऊ असूनही पक्के वैरी असतात बरे. पण अ‍ॅज युज्वल त्यांच्या बायका सोशिक, प्रेमळ आणि परिवाराला एकत्र आणण्याची इच्छा असलेल्या वैग्रे असतात. ह्या दोन्ही मामांचा अकाउंटंट म्हणजे परेश रावल. ह्या परेश रावलचा भाचा कम असिस्टंट बनून सलमान ह्या परिवारात प्रवेश करतो आणि मग पुढे काय होते ते सांगायची आवश्यकता नाहीच...



सलमाननी चित्रपटभर अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे जो अ‍ॅज युज्वल जमलेला नाही. सौथ फायटींग पुरता तो एकदम झकास, पण चित्रपटात अ‍ॅक्शन देखील चवीपुरतीच आहे. मुळात चित्रपट अ‍ॅक्शन करावा, रोमॅंटीक करावा का विनोदी करावा हेच लक्षात न आल्याने दिग्दर्शकाची प्रचंड गोची झाल्याचे चित्रपटभर जाणवत राहते. शेवटी त्याने हे सगळे एकत्र करून भेळ बनवण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केलेला आहे हे सतत जाणवत राहते. ना धड विनोद जमलाय, ना धड रोमांस. अभिनयाचा शंख कसा वाजलाय ते सांगायलाच नको. असीनचे १/२ क्लोजअप घेऊन बाकीच्या चित्रपटभर तिच्या ऐवजी राखी सावंतला घेतले असते तरी खपून गेले असते येवढी असीन ह्यात दुर्लक्षित आहे. महेश मांजरेकरला प्रत्येक वाक्यात एक शब्द विसरायला लावून काय विनोद घडवायचा प्रयत्न केला आहे ते शेवटपर्यंत समजत नाही आणि हसवत त्याहून नाही. परेश रावल एखाद दोन प्रसंगात मस्त धमाल करून जातो पण इतर दगडांची साथ न मिळाल्याने शेवटी फिकाच पडतो. पुनीत इस्सरच्या भूमिकेला देखील पाहुणी भूमिका का म्हणू नये हा अजून एक प्रश्न. अनुराधा पटेलचे बर्‍याच दिवसानंतरचे रुपेरी दर्शन सुखावह हेच त्यातल्या त्यात एक नशीब.



सर्वात डोक्यात जातो तो सुदेश लेहरी. ह्या माणसाची भूमिका अक्षरशः विनाकारण आणि पाचकळपणासाठी घुसडलेली आहे हे स्पष्ट जाणवते. कॉमेडी सर्कस गाजवलेला हा कलाकार इथे अक्षरशः फुकट गेला आहे. अभिनयातला तोचतोचपणा आणि मूर्खासारख्या चेहर्‍याने केलेला वावर अतिशय भिकार. जॉनी लिव्हरची जागा घ्यायला त्याला अजून काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत हे मात्र निश्चित.



चित्रपटाला विनोदी म्हणता येईल असा एकही प्रसंग चित्रपटात नाही. तसा रोमँटिक प्रसंग देखील नाहीचे म्हणा. पात्राचे विचित्र हावभाव, एकमेकांना स्विमिंग पूल मध्ये ढकलणे, माफिया म्हणवले जाणारे आणि जोकर्स सारखे वावरणारे, बोलणारे गुंड आणि पाण्यात पडल्यावर 'मेरा वो गीला हो गया...' ह्या सारख्या संवादांना जर विनोदी म्हणले जात असेल तर मात्र आमचा साष्टांग नमस्कार आहे. अजय देवगण, संजुबाबा, झरीन सारख्या पाहुण्या कलाकारांना तर चित्रपटाच्या पहिल्या ५ मिनिटातच टाटा बाय बाय करण्यात आलेले आहे.

'ढिंक चिका..' हे एकमेव गाणे जे सतत ऐकून ऐकून कान किटलेत, ते सोडले तर एकही गाणे लक्षात राहतं नाही. प्रितम आणि देवी श्री प्रसाद ह्या दोन दिग्गजांनी दिलेले संगीत सतत ह्या आधी कुठेतरी ऐकले असल्याचे मात्र सतत जाणवत राहते. अनिस बझ्मी ह्याचेच ह्या चित्रपटाला डायरेक्शन आहे हे काय मनाला पटत नाही बॉ ! साफ फसला आहे हा माणूस.
एकूण काय तर अपेक्षा ठेवून अथवा न ठेवून देखील रेडी मनोरंजन करण्यात साफ अपयशी ठरतो.

जोगवा

|


बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती. शेवटी परवा स्टार प्रवाहमुळे हा संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग आला.



चित्रपटाची कथा खरेतर थोडी हटके सदरात मोडणारी. आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या जोगतिणी आणि जोगत्यांच्या आयुष्याची हि कथा. ह्यातल्या जोगतिणी आपल्या बर्‍यापैकी परिचयाच्या पण जोगते सहसा शहरात तरी कमी आढळणारे. हा चित्रपट ह्या पंथाच्या रुढी, चालींवर प्रकाश टाकणारा, त्यांच्या वेदना समाजापुढे मांडणारा म्हणून मनावर ठसतो. दु:खांचे, वेदनांचे अवडंबर न माजवता, अनाठायी मेलोड्रामा न ओतता सहजसोपे पणाने सादर केलेले प्रसंग आपली छाप सोडून जातात. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मुक्ता बर्वे, विनय आपटे, अदिती देशपांडे, प्रिया बेर्डे, चिन्मय मंडलेकर अशी तगडी स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट प्रत्येक अंगाने सुबक ठरला आहे. मग तो अभिनय असो, अजय अतुल ह्यांचे कौतुकास्पद आणि अनुरूप संगीत असो, श्रेया - हरिहरन ह्यांच्या आवाजाचा गोडवा असो किंवा राजीव पाटील ह्यांचे दिग्दर्शन असो.

कर्नाटकातल्या एका छोट्या गावातील हि कथा. डोक्यात जट सापडल्याने यल्लम्माआईची भक्त असलेली अक्कुबाई सुलु (मुक्ता बर्वे)ला देवी यल्लमाच्या पायावर वाहण्याचा सल्ला देते. अर्थात आता ती जोगतीण बनणार असते. तर इकडे लघवीतुन रक्त जात असणारा तायप्पा (उपेंद्र लिमये) अशाच अंधश्रद्धेमुळे जोगत्या बनवला जातो. खरेतर हि ह्या दोघांच्या आयुष्याची कहाणी, पण हि कहाणी ह्या दोघांबरोबरच हा पंथ, ह्या पंथात आलेल्या / ढकलले गेलेल्या लोकांच्या आयुष्याचा दुर्दैवी फेरा, त्यांचे जगणे ह्या सगळ्यावरच प्रकाश टाकतो.

ह्या चित्रपटाची कथा कथा खरेतर चार ओळीत मांडता येईल, पण तिला दिग्दर्शकाने लेखकाच्या मदतीने अतिशय छान फुलवून आपल्या समोर मांडली आहे. ह्यातील कित्येक प्रसंग अतिशय हळुवार पणे चित्रित केले आहेत त्याची दाद द्यायला हवीच. यल्लमाच्या डोंगरावर एका बाजूला सुलुचे आणि दुसर्‍या बाजूला तायप्पाचे लावले जात असणारे लग्न, मैत्रिणीच्या लग्नात तिला हळद लावली जात असताना आपण मात्र आता देवाच्या पायी वाहिली जाणार ह्या विचारात गुरफटलेली सुलु, जोगत्या बनल्यावर साडीच्या आत विजार घालून निदान स्वतःपुरते आपले पुरुषत्व जपण्याचा उपेंद्र लिमयेने केलेला प्रयत्न.. असे काही प्रसंग मनात घर करून बसतात.

जोगतीण बनलेली सुलु कायमची जोगत्यांच्या मेळ्यात राहायला जाते. अल्लड सुलु मेळ्यात नवीनंच दाखल झालेल्या झांजेवाल्याच्या प्रेमात गुरफटते तर इकडे तायप्पा सुलुत गुंतत जातो. ऐनवेळी सुलुच्या होणार्‍या बाळाचे पितॄत्व नाकारून तो पळून जातो आणि सुलु कोसळून पडते. सुलुचा गर्भ पाडला जातो. अशा अवस्थेत तायप्पा सुलुला आधार देतो. सुलु कोसळून पडलेली असताना इकडे तायप्पा देखील जीवनाची वेगळीच लढाई लढत असतो. त्याच्यावर लादले गेलेले स्त्रीत्व आणि त्यामुळे त्याच्या मनाचा होणार कोंडमारा तो कुठे मोकळा देखील करू शकत नसतो. अनेक वादाच्या प्रसंगात त्याचे उफाळून येणारे पुरुषीपण आणि त्यापासून त्याला मागे खेचत त्याच्या वडिलांपासून (विनय आपटे) सर्वांनीच त्याला आता त्याच्या जोगत्या होण्याची आणि पुरुषत्व सोडल्याची वेळोवेळी करून दिलेली जाणीव काळजाला घरे पाडते.





विशेष उल्लेख करावा लागेल तो किशोर कदम ह्यांनी साकारलेल्या यमन्या ह्या जोगत्याचा. सर्वांची काळजी घेणारा, सर्वांना सांभाळून घेणारा यमन्या आतून मात्र पूर्ण पोखरला गेलेला आहे. दारूच्या आहारी गेलेला आहे. पुरुषत्व सोडून जाणे म्हणजे काय हे यमन्याने पुरेपूर अनुभवलेले आहे. एका प्रसंगात तो नदीवर उघडा अंघोळ करत असतो आणि काही मुले त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळी तो उपेंद्र लिमयेला म्हणतो "माझ्या उघड्या अंगाकडे पुरुषाने असे बघितले की मनाला कसे हळुवार वाटते" तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. जोगत्या झाल्याझाल्या आलेल्या अनुभवांची, पुरुषांकडून मिळालेल्या अनैसर्गिक वागणुकीची कथा जेव्हा यमन्या विझलेल्या डोळ्यांनी सांगतो तेव्हा आपण अंतर्बाह्य हादरतो. ह्या कथा आपण ह्याआधी ऐकलेल्या असतात देखील पण किशोर कदमकडुन ते ऐकताना जणू त्यांनी तो अनुभव प्रत्यक्षात घेतलाच आहे असे वाटत राहते आणि ते काळजाला अधिक भिडते.



पुढे सुलु आणि तायप्पा मनाने आणि शरीराने देखील एकमेकांच्या जवळ येतात. पंथातील काही गोष्टी त्यांना अविचारी वाटत असतानाच गावातले मास्तर ह्या पंथातील अंधश्रद्धा, रुढी ह्या विषयी आवाज उठवायला सुरुवात करतात. एकमेकांच्यात गुंतलेले सुलु आणि तायप्पा पंथ सोडण्याचा आणि संसार करण्याचा निर्णय घेतात आणि संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात पेटून उठतो. पुढे काय होते ते पडद्यावरच अनुभवण्याजोगे...



उपेंद्र दाते, किशोर कदम, मुक्ता बर्वे ह्यांच्या जोडीलाच विनय आपटे, अदिती देशपांडे ह्यांची देखील अभिनयाची आघाडी उत्तम सांभाळली आहे. देवीवर नितांत श्रद्धा ठेवणारी, वेळेला मेळ्यातल्या जोगतिणींच्या हक्कासाठी पंचायती समोर उभी राहणारी पंथाच्या मेळ्याची प्रमुख अदिती देशपांडे ह्यांनी उत्तम साकारली आहे. तर जोगत्या झालेल्या पोराच्या बापाच्या भूमिकेत विनय आपटे त्यांच्या वाट्याला आलेले बरेच प्रसंग खाऊन जातात. स्वतःच्या घरी जोगवा मागायला आलेल्या उपेंद्र लिमयेला पाहून ते जेव्हा हातातली दोरी रागारागाने गुंडाळत त्याच्या नावाने शिव्या देतात तो प्रसंग तर एकदम खासच.

उपेंद्र दाते आणि मुक्ता बर्वे त्यांच्या भूमिका अक्षरशः जगले आहेत येवढे सांगितले तरी पुरे. ह्या सगळ्याला छानसे कोंदण लाभले आहे ते अजय अतुल ह्यांच्या संगीताचे आणि हरिहरन, श्रेया ह्यांच्या गोड गळ्याचे. 'जीव रंगला' आणि 'ललाटी भंडार' हि गाणी अविस्मरणीयच.




एकुणं काय तर पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जोगवा एकदा नक्की अनुभवण्याजोगा.


क्षणभर विश्रांती

|
परवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे. मात्र कमरेखाली न जाणारे विनोद, अतिभावनाप्रधान फुलपाखरी अश्रुपाताला घातलेला आवर, दिग्दर्शकाच्या ताब्यात राहिलेला भरत जाधव आणि फ्रेश आणि तरुण चेहर्‍यांना मिळालेली सुंदर संधी ह्यामुळे चित्रपट आवडून गेला.



चित्रपटाचे तांत्रिक स्वरूप आणि स्टारकास्ट सुद्धा सचित पाटील, हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांनी व्यापून टाकलेली आहे. ह्या चित्रपटात अभिनय करण्याबरोबर सचित पाटील (दिग्दर्शक आणि कथा), मौलिक भट (प्रोड्युसर), हेमंत ढोमे (संवाद) अशा जबाबदार्‍या सुद्धा लिलया पेलून गेलेले आहेत. तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल. चित्रपटात हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांच्या बरोबरच कादंबरी कदम, मनवा नाईक आणि पुजा सावंत ह्या नवीनं चेहर्‍यांच्या तरुणींना देखील संधी मिळाली आहे. त्या दिसल्या आहेत छान आणि अभिनयात देखील कमी पडत नाहीत हे विशेष. खरेतर चित्रपटाची कथाच इतकी साधी सरळ आहे की ह्या लोकांना फार अभिनय करायची गरजच पडली नाहीये.

हृषिकेश कामेरकर ह्या गुणी गायक आणि संगीतकाराला मिळालेली संधी हे ह्या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य, त्याने ह्या संधीचे सोने केले आहे. संगीताच्या आणि गाण्याच्या बाबतीत चित्रपट सरसच.



काय आहे ह्या चित्रपटाची कथा ? कथा एकदम सरळ.. सचित पाटील हा अमेरिकेत नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर बर्‍याच वर्षांनी मुंबईत परत आला आहे आणि आता त्याला आपल्या जीवाभावाच्या मित्रांना भेटायचे वेध लागलेले आहेत. हे मित्र म्हणजे भुर्जीपावची गाडी लावणार सिद्धार्थ जाधव, कवी असणारा पण एका मेडिकलच्या दुकानात नोकरी करणार हेमंत ढोमे आणि समांतर रंगभूमीवर नट म्हणून नशीब अजमावत असलेला मौलिक भट. सचित देखील खरेतर एक छानसा गायक असतो पण आयुष्यात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो गाण्याला रामराम ठोकून नोकरीसाठी अमेरिका गाठतो. आता निदान आपले मित्र तरी त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करत आहेत का नाही हे त्याला जाणून घ्यायचे असते. सचितचे एकूणच सगळे सुरळीत चाललेले बघून हे सर्व मित्र त्याच्याशी खोटेच बोलतात. सिद्धार्थ आपले मोठे हॉटेल असल्याचे सांगतो, हेमंत आपला कविता संग्रह छापला गेल्याचे तर मौलिक आपण यशस्वी नट असल्याचे भासवतो. मित्रांच्या यशाने आनंदित सचित पाटील त्यांना आता अलिबागला जाण्याचा प्लॅन सांगतो. सचितच्या अमेरिकेतील कमाईतून वडिलांनी तिथे एक बंगला घेतलेला असतो. त्या बंगल्याला एक भेट आणि त्यानिमित्ताने पिकनिक असा बेत ठरवून सर्वजण अलिबागला कुच करतात.



इकडे अलिबागच्या बंगल्यात वेगळेच नाटक रंगलेले असते. बर्‍याच वर्षे कोणी न फिरकलेल्या त्या बंगल्यात आता बंगल्याचा केअर टेकर असलेल्या भरत जाधवने (आप्पा) खानावळ आणि लॉज उघडलेले असते. ह्या सगळ्यात अचानक सचित येत असल्याचा त्याच्या वडिलांचा फोन आल्यावर भरतची तारांबळ उडते. जेवणार्‍या लोकांना ताटावरून उठवण्यापासून ते खोलीत राहणार्‍यांना आहे त्या कपड्यानिशी बाहेर काढण्यापर्यंतची कामे तो १० मिनिटात उरकतो. मधल्या काळात नोकराकडून बंगल्याबाहेर लावलेला 'क्षणभर विश्रांती' हॉटेलचा बोर्ड देखील काढून घेतो. बंगल्यात शिरत असताना दारातच येवढी गर्दी बघून सचित चौकशी करतोच, मात्र बंगला बघायला पर्यटक येत असतात असले कारण सांगून भरत वेळ मारून नेतो.

बहीण शुभांगी गोखले (जिजी ) , नोकर आणि मुंबईत शिकणारी भाची ह्या सर्वांशी खोटे बोलून हॉटेल चालवणार्‍या भरतची आता मात्र तारांबळ उडते. त्यातच त्याची मुंबईला शिकणारी भाची आपल्या तीन मैत्रिणींना घेऊन ट्रीपला आलेली असते आणि बंगल्यातच राहत असते. नेहमीप्रमाणेच सचित, सिद्धार्थ, हेमंत आणि मौलिक हे त्या चार जणींच्या प्रेमात पडतात आणि कथा नेहमीच्या वळणाने जायला लागते. मात्र अचानक एक दिवशी भरतचे बिंग फुटते. बहिणीच्या आजारपणासाठी आणि भाचीच्या शिक्षणासाठी हे सर्व केल्याचे भरत सांगतो आणि सचितची क्षमा मागतो. मोठ्या मनाने सचित त्याला माफ करतो आणि इथे असे पर्यंत भरतला बहीण आणि भाची समोर खोटे न पाडण्याची जबाबदारी घेतो. त्यानंतर ह्या चौघा जणांच्यात थोड्याश्या नेहमीच्या रुसव्या फुगव्यानंतर प्रेमाचे अंकुर फुटायला सुरुवात होते आणि अचानक एक दिवशी सचित आपण हा बंगला विकणार असल्याचे जाहीर करतो.




ह्यानंतर कथा नेहमीचेच वळण घेते का अजून काही अनपेक्षित घडते ? हे चित्रपटातच बघण्यात मजा आहे.
अभिनयाच्या आघाडीवर भरत जाधव, सिद्धार्थ, सचित पाटील अप्रतिमच. जिजिच्या भूमिकेत शुभांगी गोखले नेहमीप्रमाणेच यशस्वी खेळी खेळून गेल्या आहेत. हेमंत ढोमे, मैलिक भट, कादंबरी कदम, पुजा जाधव आणि मनवा नाईक आपापली कामे व्यवस्थित पार पाडतात. मुख्य म्हणजे कुठेही लाउड अभिनय जाणवत नाही. भरत जाधवने त्याच्या वाटेला आलेले हळवे प्रसंग अतिशय सुरेख उभे केले आहेत, त्याबद्दल त्याला विशेष दाद द्यायला लागेल. सोनाली कुलकर्णी दिसली आहे छान आणि अभिनयात देखील उत्तम. चित्रपटात खटकलेली एकमेव गोष्ट म्हणजे अलिबागच्या निसर्गसौंदर्याचा १०% सुद्धा वापर चित्रपटात करण्यात आलेला नाही.


तर मग कधी घेताय 'क्षणभर विश्रांती' ?

अल्लाह के बंदे

|
बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.



नसिरुद्दिन शहा, अतुल कुलकर्णी, सुहासिनी मुळे, विक्रम गोखले, झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी, रुखसार, सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज. चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या. ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे.

मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात (का शर्टात? ) निराशाच पडली. अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी ५ मिनिटांच्या वर भरणार नाही. सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही. सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून. एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही, बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे. नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत 'दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या 'के के' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मिळतीजुळती कसली? आपण 'के के' लाच पाहत आहोत असे वाटत राहते.



असो...

तर आता मूळ कथेकडे वळू. विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या 'भुलभुलय्या' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र, सख्खे भाऊच म्हणाना. आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते. तिचाच मुलगा म्हणजे विजय. शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम. बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत. रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी, विषारी दारू, चरस, लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि 'भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे.

तर ह्या दोघा जय-विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो. अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात. त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात. आपल्याच वयाच्या चार/पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात. वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा न देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते, त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो. जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात. इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो.



चोरी, खून, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते. बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २०-२२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि 'के टी' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात. जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते. ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा.

भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते. केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते. ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते. एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 'के टी' चा खून करतात. खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते, ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते. एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात.



काही वर्षात (म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात. जुना मित्र रमेश (झाकीर हुसेन) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात. घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो. ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे (अतुल कुलकर्णी) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही. अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे. इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ... आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते.



ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या (अंजना सुखानी) चे आगमन, हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते. चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास!!



विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे. कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते. याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे. हा याकुब, हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो. गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला, विकृत हसणारा, बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे. अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही.

तात्पर्य काय तर 'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. '