रागिणी MMS

|


काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे. खरे सांगायचे तर चित्रपट सुरु झाल्यापासून हळूहळू आता हा सॉफ्ट पॉर्न कडे झुकतो का काय? असाच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मध्यांतरानंतर तर चित्रपटाला ताण ताण ताणले आहे आणी तिथेच सगळी मजा निघून जाते.



रागिणीचा (कैनाझ मोतीवाला) मित्र उदय (राजकुमार यादव) तीला विकेंडसाठी शहराबाहेरच्या एका फार्महाऊस वरती घेऊन जातो. हे फार्महाऊस जंगलात असते. रागिणी आनंदात असते मात्र उदयच्या मनात काही वेगळेच विचार असतात. ऍक्टर व्हायची स्वप्ने बघणारा उदय आपल्या मित्र पंडित ह्याच्या साहाय्याने त्या फार्महाऊस मध्ये रागिणीची सेक्सटेप चित्रित करणार असतो. रागिणी मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असते.
इकडे बंगल्यात शिरल्या शिरल्याच आधी लाइट नसल्याचे कळते मग उदय एका अडगळीच्या आणि अंधार्‍या बोळातल्या खोलीत जाऊन स्विच शोधतो. त्याच खोलीत त्याला मॉनिटरवरती त्याच्या मित्राने संपूर्ण फार्महाऊसमध्ये विविध ठिकाणी लपवलेले कॅमेरे दिसतात. आनंदलेला उदय हॉल मध्ये येतो आणि ताबडतोब त्याच्या प्रेमचाळ्यांना ऊत येतो. रागिणी मात्र 'भूक लागलीये म्हणून ओरडत असते.' मग पॅक करून आणलेला डबा बाहेर काढला जातो ज्यात अचानक आळ्या निघतात. (हे राम !) मग शेवटी ते अन्न फेकून देण्यात येते. तोवर बरीच रात्र झालेली असल्याने आता दोघेही वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे मोर्चा वळवतात. (इथे प्रेक्षकही सावरून बसतात)



बाथरुम मध्ये रागिणी फ्रेश होईपर्यंत इकडे उदय टीव्ही मध्ये लपवलेल्या कॅमेर्‍याची सेटिंग वैग्रे अ‍ॅडजेस्ट करून घेतो. रागिणी बाहेर आल्यावर पुन्हा प्रेमचाळ्याना ऊत येतो... पण ह्या वेळी बंगल्याच्या दारावर थापा ऐकायला येऊन लागतात आणि पुन्हा आपल्या आणि उदयच्या रंग मे भंग होतो. हिलस्टेशनला निघालेले रागिणीचे मित्र पिया आणि उदय जाता जाता तिला भेटायला आलेले असतात. नुसते आलेले नसतात तर बिअर वैग्रे घेऊन पार्टिच्या तयारीनेच आलेले असतात. आता उदयची चिडचिड चालू होते, मात्र रागिणी त्याची समजूत काढते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच उदयला बंगल्याच काहीतरी विचित्र जाणवते, आसपास कोणीतरी वावरत आहे असे वाटायला लागते. त्याच्या मानेवर अचानक वार देखील होतो. गावात कोणीतरी सांगितलेली त्या बंगल्यातल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या बाईला चेटकीण म्हणून मारल्याची आणि तिच इथे वावरत असल्याची गोष्ट त्याला आठवते. ती गोष्ट तो सगळ्यांना सांगून पियाला घेऊन तिथून पळ काढतो.
आता सगळी आवरा आवर करून पुन्हा उदय आणि रागिणी बेडरूम मध्ये (पुन्हा प्रेक्षकांच्या आशा पल्लवित) जातात. पुन्हा त्यांच्या प्रेमप्रदर्शनाला उत येतो. ह्यावेळी उदय रागिणीचे हात बेड्यांनी बेडला बांधतो आणि प्रेमाचा नवाच आविष्कार दाखवतो. त्यांचे प्रेम रंगात आलेले असतानाच उदयचे केस धरून त्याल कोणीतरी ओढते आणि दोघांचा थरकाप उडतो. त्या दोघांशिवाय अजून कोणीतरी आणि ते ही अमानवीय अस्तित्व आजूबाजूला वावरत आहे ह्याची त्यांना जाणीव होते. ह्यासर्वात बेड्यांची किल्ली हरवते, मोबाईलची बॅटरी संपते आणि शेवटी उदय झपाटला जातो आणि आत्महत्या करतो. आता उरते ते बेड्यांमध्ये हात अडकलेली असाहाय्य रागिणी आणि ते अस्तित्व...



पुढे काय होते ते चित्रपटातच बघण्यात खरी रंगत आहे. आता ती प्रत्येकालाच रंगत वाटेल असा माझा दावा नाही. चित्रपटातले अमानवीय अस्तित्व हे एका सो कॉल्ड चेटकिणीचे दाखवले असून ते मराठी भाषिक दाखवली आहे हे रहस्य उघड करायला हरकत नाही. तीचे 'मी चेटकीण नाही... मी माझ्या मुलांना मारले नाही..' चे पालुपद मात्र असह्य. खरे सांगायचे तर कैनाझचा एकूण मादक लुक आणि बोल्ड दृश्यात देखील तिने न लाजता दिलेली साथ ह्यासाठी सुद्धा हा चित्रपट बघायला हरकत नाही. हो..उगा ताकाला जाऊन भांडे का लपवा ? ती दिसली आहे मादक आणि अभिनय देखील बराच चांगला केला आहे. राजकुमार यादव देखील ठीकठाकच, मात्र त्याची घाबरल्याचा जो अभिनय केला आहे ना तो का कुणास ठावुक खदखदून हसवून जातो आपल्याला.


तर सांगायचा मुद्दा काय तर थरारपटाची म्हणून फार मोठी अपेक्ष न ठेवता नव्या चेहर्‍यांचा टैमपास चित्रपट म्हणून हा बघायला नक्कीच हरकत नाही.

रेडी ? नो रेडी ssSSsss ...

|


वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती. (इथे 'अपेक्षा उंचावली होती' असे म्हणालेले नाही ह्याची नोंद घेतल्या जावी.) अगदी फुल्ल्टू धमाल नसेल पण निदान दोन अडीच तास जो काय चित्रपटाचा कालावधी असेल तो झकास जाईल ह्या कल्पनेने रेडीला हजेरी लावली.



सलमान, असीन, परेश रावल, पुनीत इस्सर, मनोज जोशी हे शिलेदार, महेश मांजरेकर, आर्य बब्बर, अनुराधा पटेल हे सैनिक आणि पाहुण्या भूमिकेत संजु बाबा, चंकी पांडे, आरबाज खान, अजय देवगण आणि झरीन खान अशी फौज असताना मस्त झणझणीत भेळेचा बकाणा भरायला मिळणार ह्या आशेने आम्ही स्थानापन्न झालो. खरंच सांगतो तुम्हाला चित्रपट सुरु झाल्यापासून १५ व्या मिनिटाला आम्ही 'चित्रपटालाच नाही तर पृथ्वीवरच का आलो ?' असा प्रश्न स्वतःला विचाराण्यायेवढे निराश आणि हताश झालो.

खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे. आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल. सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार, म्हणजे खरेतर १०/१२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी. पटकथा = कथाच नाही हो., पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे. आणि सलमान तर असह्यच होतो. देव आनंद.. अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःचा चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर सलमानवर केंद्रित आहे. (मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे.)

बरं आता तुम्हाला स्टोरी सांगायची म्हणली तर ती चार ओळीत देखील मावायची बोंबाबोंब. सलमान एक 'मासूम चेहरेवाला कमींना' असतो आणि त्याचा बाप महेश मांजरेकर हा करोडपती असतो आणि विनाकारण विनोद निर्मितीसाठी तो विसराळू देखील असतो. तो नक्की काय धंदा करत असतो हा भाग अलाहिदा. तर ह्या सलमानचा एक भरापुरा परिवार असतो. २ काका , २ काकवा, २ नोकराणी, एक कुत्री इ. इ. कुटुंबाचे एक गुरुजी देखील असतात, ज्यांच्या सल्ल्यानेच घरातली काडी इकडची तिकडे हालत असते. हे गुरुजी सलमान अर्थात प्रेम साठी पूजा नावाची एक कन्या निश्चित करतात आणि तीला एयरपोर्ट वरून आणायची जबाबदारी अर्थात प्रेमवर येते. मग साहेब मुद्दामून वेगळ्याच टर्मिनलवर जाऊन उभे राहतात आणि पूजा विषयी काकाशी गप्पा मारत बसतात. इकडे स्वतःचे लग्न मान्य नसल्याने पळून आलेली आणि माफिया कुटुंबाशी निगडित असलेली असीन अर्थात संजना ह्याचे बोलणे ऐकते आणि पूजा असल्याचा बनाव करून प्रेमच्या घरात आश्रय घेते.



मग सलमानचे असीन वर आणि असीनचे सलमानवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न अ‍ॅज युज्वल सुरु होतात. मग अचानक सलमानला असीनच्या सच्चाईचा पत्ता वैग्रे लागतो आणि मग लवकरच दोघांना आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार देखील होतो. मग हळूहळू संजनाच्या कुटुंबाची ओळख होते. तीचे दोन्ही मामा तिच्या २०० करोड रुपायाच्या फॅमिलीसाठी तीचे लग्न आपापल्या साल्यांबरोबर लावायच्या तयारीत असतात. हे दोन्ही मामा सख्खे भाऊ असूनही पक्के वैरी असतात बरे. पण अ‍ॅज युज्वल त्यांच्या बायका सोशिक, प्रेमळ आणि परिवाराला एकत्र आणण्याची इच्छा असलेल्या वैग्रे असतात. ह्या दोन्ही मामांचा अकाउंटंट म्हणजे परेश रावल. ह्या परेश रावलचा भाचा कम असिस्टंट बनून सलमान ह्या परिवारात प्रवेश करतो आणि मग पुढे काय होते ते सांगायची आवश्यकता नाहीच...



सलमाननी चित्रपटभर अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे जो अ‍ॅज युज्वल जमलेला नाही. सौथ फायटींग पुरता तो एकदम झकास, पण चित्रपटात अ‍ॅक्शन देखील चवीपुरतीच आहे. मुळात चित्रपट अ‍ॅक्शन करावा, रोमॅंटीक करावा का विनोदी करावा हेच लक्षात न आल्याने दिग्दर्शकाची प्रचंड गोची झाल्याचे चित्रपटभर जाणवत राहते. शेवटी त्याने हे सगळे एकत्र करून भेळ बनवण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केलेला आहे हे सतत जाणवत राहते. ना धड विनोद जमलाय, ना धड रोमांस. अभिनयाचा शंख कसा वाजलाय ते सांगायलाच नको. असीनचे १/२ क्लोजअप घेऊन बाकीच्या चित्रपटभर तिच्या ऐवजी राखी सावंतला घेतले असते तरी खपून गेले असते येवढी असीन ह्यात दुर्लक्षित आहे. महेश मांजरेकरला प्रत्येक वाक्यात एक शब्द विसरायला लावून काय विनोद घडवायचा प्रयत्न केला आहे ते शेवटपर्यंत समजत नाही आणि हसवत त्याहून नाही. परेश रावल एखाद दोन प्रसंगात मस्त धमाल करून जातो पण इतर दगडांची साथ न मिळाल्याने शेवटी फिकाच पडतो. पुनीत इस्सरच्या भूमिकेला देखील पाहुणी भूमिका का म्हणू नये हा अजून एक प्रश्न. अनुराधा पटेलचे बर्‍याच दिवसानंतरचे रुपेरी दर्शन सुखावह हेच त्यातल्या त्यात एक नशीब.



सर्वात डोक्यात जातो तो सुदेश लेहरी. ह्या माणसाची भूमिका अक्षरशः विनाकारण आणि पाचकळपणासाठी घुसडलेली आहे हे स्पष्ट जाणवते. कॉमेडी सर्कस गाजवलेला हा कलाकार इथे अक्षरशः फुकट गेला आहे. अभिनयातला तोचतोचपणा आणि मूर्खासारख्या चेहर्‍याने केलेला वावर अतिशय भिकार. जॉनी लिव्हरची जागा घ्यायला त्याला अजून काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत हे मात्र निश्चित.



चित्रपटाला विनोदी म्हणता येईल असा एकही प्रसंग चित्रपटात नाही. तसा रोमँटिक प्रसंग देखील नाहीचे म्हणा. पात्राचे विचित्र हावभाव, एकमेकांना स्विमिंग पूल मध्ये ढकलणे, माफिया म्हणवले जाणारे आणि जोकर्स सारखे वावरणारे, बोलणारे गुंड आणि पाण्यात पडल्यावर 'मेरा वो गीला हो गया...' ह्या सारख्या संवादांना जर विनोदी म्हणले जात असेल तर मात्र आमचा साष्टांग नमस्कार आहे. अजय देवगण, संजुबाबा, झरीन सारख्या पाहुण्या कलाकारांना तर चित्रपटाच्या पहिल्या ५ मिनिटातच टाटा बाय बाय करण्यात आलेले आहे.

'ढिंक चिका..' हे एकमेव गाणे जे सतत ऐकून ऐकून कान किटलेत, ते सोडले तर एकही गाणे लक्षात राहतं नाही. प्रितम आणि देवी श्री प्रसाद ह्या दोन दिग्गजांनी दिलेले संगीत सतत ह्या आधी कुठेतरी ऐकले असल्याचे मात्र सतत जाणवत राहते. अनिस बझ्मी ह्याचेच ह्या चित्रपटाला डायरेक्शन आहे हे काय मनाला पटत नाही बॉ ! साफ फसला आहे हा माणूस.
एकूण काय तर अपेक्षा ठेवून अथवा न ठेवून देखील रेडी मनोरंजन करण्यात साफ अपयशी ठरतो.

जोगवा

|


बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती. शेवटी परवा स्टार प्रवाहमुळे हा संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग आला.



चित्रपटाची कथा खरेतर थोडी हटके सदरात मोडणारी. आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या जोगतिणी आणि जोगत्यांच्या आयुष्याची हि कथा. ह्यातल्या जोगतिणी आपल्या बर्‍यापैकी परिचयाच्या पण जोगते सहसा शहरात तरी कमी आढळणारे. हा चित्रपट ह्या पंथाच्या रुढी, चालींवर प्रकाश टाकणारा, त्यांच्या वेदना समाजापुढे मांडणारा म्हणून मनावर ठसतो. दु:खांचे, वेदनांचे अवडंबर न माजवता, अनाठायी मेलोड्रामा न ओतता सहजसोपे पणाने सादर केलेले प्रसंग आपली छाप सोडून जातात. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मुक्ता बर्वे, विनय आपटे, अदिती देशपांडे, प्रिया बेर्डे, चिन्मय मंडलेकर अशी तगडी स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट प्रत्येक अंगाने सुबक ठरला आहे. मग तो अभिनय असो, अजय अतुल ह्यांचे कौतुकास्पद आणि अनुरूप संगीत असो, श्रेया - हरिहरन ह्यांच्या आवाजाचा गोडवा असो किंवा राजीव पाटील ह्यांचे दिग्दर्शन असो.

कर्नाटकातल्या एका छोट्या गावातील हि कथा. डोक्यात जट सापडल्याने यल्लम्माआईची भक्त असलेली अक्कुबाई सुलु (मुक्ता बर्वे)ला देवी यल्लमाच्या पायावर वाहण्याचा सल्ला देते. अर्थात आता ती जोगतीण बनणार असते. तर इकडे लघवीतुन रक्त जात असणारा तायप्पा (उपेंद्र लिमये) अशाच अंधश्रद्धेमुळे जोगत्या बनवला जातो. खरेतर हि ह्या दोघांच्या आयुष्याची कहाणी, पण हि कहाणी ह्या दोघांबरोबरच हा पंथ, ह्या पंथात आलेल्या / ढकलले गेलेल्या लोकांच्या आयुष्याचा दुर्दैवी फेरा, त्यांचे जगणे ह्या सगळ्यावरच प्रकाश टाकतो.

ह्या चित्रपटाची कथा कथा खरेतर चार ओळीत मांडता येईल, पण तिला दिग्दर्शकाने लेखकाच्या मदतीने अतिशय छान फुलवून आपल्या समोर मांडली आहे. ह्यातील कित्येक प्रसंग अतिशय हळुवार पणे चित्रित केले आहेत त्याची दाद द्यायला हवीच. यल्लमाच्या डोंगरावर एका बाजूला सुलुचे आणि दुसर्‍या बाजूला तायप्पाचे लावले जात असणारे लग्न, मैत्रिणीच्या लग्नात तिला हळद लावली जात असताना आपण मात्र आता देवाच्या पायी वाहिली जाणार ह्या विचारात गुरफटलेली सुलु, जोगत्या बनल्यावर साडीच्या आत विजार घालून निदान स्वतःपुरते आपले पुरुषत्व जपण्याचा उपेंद्र लिमयेने केलेला प्रयत्न.. असे काही प्रसंग मनात घर करून बसतात.

जोगतीण बनलेली सुलु कायमची जोगत्यांच्या मेळ्यात राहायला जाते. अल्लड सुलु मेळ्यात नवीनंच दाखल झालेल्या झांजेवाल्याच्या प्रेमात गुरफटते तर इकडे तायप्पा सुलुत गुंतत जातो. ऐनवेळी सुलुच्या होणार्‍या बाळाचे पितॄत्व नाकारून तो पळून जातो आणि सुलु कोसळून पडते. सुलुचा गर्भ पाडला जातो. अशा अवस्थेत तायप्पा सुलुला आधार देतो. सुलु कोसळून पडलेली असताना इकडे तायप्पा देखील जीवनाची वेगळीच लढाई लढत असतो. त्याच्यावर लादले गेलेले स्त्रीत्व आणि त्यामुळे त्याच्या मनाचा होणार कोंडमारा तो कुठे मोकळा देखील करू शकत नसतो. अनेक वादाच्या प्रसंगात त्याचे उफाळून येणारे पुरुषीपण आणि त्यापासून त्याला मागे खेचत त्याच्या वडिलांपासून (विनय आपटे) सर्वांनीच त्याला आता त्याच्या जोगत्या होण्याची आणि पुरुषत्व सोडल्याची वेळोवेळी करून दिलेली जाणीव काळजाला घरे पाडते.





विशेष उल्लेख करावा लागेल तो किशोर कदम ह्यांनी साकारलेल्या यमन्या ह्या जोगत्याचा. सर्वांची काळजी घेणारा, सर्वांना सांभाळून घेणारा यमन्या आतून मात्र पूर्ण पोखरला गेलेला आहे. दारूच्या आहारी गेलेला आहे. पुरुषत्व सोडून जाणे म्हणजे काय हे यमन्याने पुरेपूर अनुभवलेले आहे. एका प्रसंगात तो नदीवर उघडा अंघोळ करत असतो आणि काही मुले त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळी तो उपेंद्र लिमयेला म्हणतो "माझ्या उघड्या अंगाकडे पुरुषाने असे बघितले की मनाला कसे हळुवार वाटते" तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. जोगत्या झाल्याझाल्या आलेल्या अनुभवांची, पुरुषांकडून मिळालेल्या अनैसर्गिक वागणुकीची कथा जेव्हा यमन्या विझलेल्या डोळ्यांनी सांगतो तेव्हा आपण अंतर्बाह्य हादरतो. ह्या कथा आपण ह्याआधी ऐकलेल्या असतात देखील पण किशोर कदमकडुन ते ऐकताना जणू त्यांनी तो अनुभव प्रत्यक्षात घेतलाच आहे असे वाटत राहते आणि ते काळजाला अधिक भिडते.



पुढे सुलु आणि तायप्पा मनाने आणि शरीराने देखील एकमेकांच्या जवळ येतात. पंथातील काही गोष्टी त्यांना अविचारी वाटत असतानाच गावातले मास्तर ह्या पंथातील अंधश्रद्धा, रुढी ह्या विषयी आवाज उठवायला सुरुवात करतात. एकमेकांच्यात गुंतलेले सुलु आणि तायप्पा पंथ सोडण्याचा आणि संसार करण्याचा निर्णय घेतात आणि संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात पेटून उठतो. पुढे काय होते ते पडद्यावरच अनुभवण्याजोगे...



उपेंद्र दाते, किशोर कदम, मुक्ता बर्वे ह्यांच्या जोडीलाच विनय आपटे, अदिती देशपांडे ह्यांची देखील अभिनयाची आघाडी उत्तम सांभाळली आहे. देवीवर नितांत श्रद्धा ठेवणारी, वेळेला मेळ्यातल्या जोगतिणींच्या हक्कासाठी पंचायती समोर उभी राहणारी पंथाच्या मेळ्याची प्रमुख अदिती देशपांडे ह्यांनी उत्तम साकारली आहे. तर जोगत्या झालेल्या पोराच्या बापाच्या भूमिकेत विनय आपटे त्यांच्या वाट्याला आलेले बरेच प्रसंग खाऊन जातात. स्वतःच्या घरी जोगवा मागायला आलेल्या उपेंद्र लिमयेला पाहून ते जेव्हा हातातली दोरी रागारागाने गुंडाळत त्याच्या नावाने शिव्या देतात तो प्रसंग तर एकदम खासच.

उपेंद्र दाते आणि मुक्ता बर्वे त्यांच्या भूमिका अक्षरशः जगले आहेत येवढे सांगितले तरी पुरे. ह्या सगळ्याला छानसे कोंदण लाभले आहे ते अजय अतुल ह्यांच्या संगीताचे आणि हरिहरन, श्रेया ह्यांच्या गोड गळ्याचे. 'जीव रंगला' आणि 'ललाटी भंडार' हि गाणी अविस्मरणीयच.




एकुणं काय तर पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जोगवा एकदा नक्की अनुभवण्याजोगा.


क्षणभर विश्रांती

|
परवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे. मात्र कमरेखाली न जाणारे विनोद, अतिभावनाप्रधान फुलपाखरी अश्रुपाताला घातलेला आवर, दिग्दर्शकाच्या ताब्यात राहिलेला भरत जाधव आणि फ्रेश आणि तरुण चेहर्‍यांना मिळालेली सुंदर संधी ह्यामुळे चित्रपट आवडून गेला.



चित्रपटाचे तांत्रिक स्वरूप आणि स्टारकास्ट सुद्धा सचित पाटील, हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांनी व्यापून टाकलेली आहे. ह्या चित्रपटात अभिनय करण्याबरोबर सचित पाटील (दिग्दर्शक आणि कथा), मौलिक भट (प्रोड्युसर), हेमंत ढोमे (संवाद) अशा जबाबदार्‍या सुद्धा लिलया पेलून गेलेले आहेत. तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल. चित्रपटात हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांच्या बरोबरच कादंबरी कदम, मनवा नाईक आणि पुजा सावंत ह्या नवीनं चेहर्‍यांच्या तरुणींना देखील संधी मिळाली आहे. त्या दिसल्या आहेत छान आणि अभिनयात देखील कमी पडत नाहीत हे विशेष. खरेतर चित्रपटाची कथाच इतकी साधी सरळ आहे की ह्या लोकांना फार अभिनय करायची गरजच पडली नाहीये.

हृषिकेश कामेरकर ह्या गुणी गायक आणि संगीतकाराला मिळालेली संधी हे ह्या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य, त्याने ह्या संधीचे सोने केले आहे. संगीताच्या आणि गाण्याच्या बाबतीत चित्रपट सरसच.



काय आहे ह्या चित्रपटाची कथा ? कथा एकदम सरळ.. सचित पाटील हा अमेरिकेत नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर बर्‍याच वर्षांनी मुंबईत परत आला आहे आणि आता त्याला आपल्या जीवाभावाच्या मित्रांना भेटायचे वेध लागलेले आहेत. हे मित्र म्हणजे भुर्जीपावची गाडी लावणार सिद्धार्थ जाधव, कवी असणारा पण एका मेडिकलच्या दुकानात नोकरी करणार हेमंत ढोमे आणि समांतर रंगभूमीवर नट म्हणून नशीब अजमावत असलेला मौलिक भट. सचित देखील खरेतर एक छानसा गायक असतो पण आयुष्यात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो गाण्याला रामराम ठोकून नोकरीसाठी अमेरिका गाठतो. आता निदान आपले मित्र तरी त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करत आहेत का नाही हे त्याला जाणून घ्यायचे असते. सचितचे एकूणच सगळे सुरळीत चाललेले बघून हे सर्व मित्र त्याच्याशी खोटेच बोलतात. सिद्धार्थ आपले मोठे हॉटेल असल्याचे सांगतो, हेमंत आपला कविता संग्रह छापला गेल्याचे तर मौलिक आपण यशस्वी नट असल्याचे भासवतो. मित्रांच्या यशाने आनंदित सचित पाटील त्यांना आता अलिबागला जाण्याचा प्लॅन सांगतो. सचितच्या अमेरिकेतील कमाईतून वडिलांनी तिथे एक बंगला घेतलेला असतो. त्या बंगल्याला एक भेट आणि त्यानिमित्ताने पिकनिक असा बेत ठरवून सर्वजण अलिबागला कुच करतात.



इकडे अलिबागच्या बंगल्यात वेगळेच नाटक रंगलेले असते. बर्‍याच वर्षे कोणी न फिरकलेल्या त्या बंगल्यात आता बंगल्याचा केअर टेकर असलेल्या भरत जाधवने (आप्पा) खानावळ आणि लॉज उघडलेले असते. ह्या सगळ्यात अचानक सचित येत असल्याचा त्याच्या वडिलांचा फोन आल्यावर भरतची तारांबळ उडते. जेवणार्‍या लोकांना ताटावरून उठवण्यापासून ते खोलीत राहणार्‍यांना आहे त्या कपड्यानिशी बाहेर काढण्यापर्यंतची कामे तो १० मिनिटात उरकतो. मधल्या काळात नोकराकडून बंगल्याबाहेर लावलेला 'क्षणभर विश्रांती' हॉटेलचा बोर्ड देखील काढून घेतो. बंगल्यात शिरत असताना दारातच येवढी गर्दी बघून सचित चौकशी करतोच, मात्र बंगला बघायला पर्यटक येत असतात असले कारण सांगून भरत वेळ मारून नेतो.

बहीण शुभांगी गोखले (जिजी ) , नोकर आणि मुंबईत शिकणारी भाची ह्या सर्वांशी खोटे बोलून हॉटेल चालवणार्‍या भरतची आता मात्र तारांबळ उडते. त्यातच त्याची मुंबईला शिकणारी भाची आपल्या तीन मैत्रिणींना घेऊन ट्रीपला आलेली असते आणि बंगल्यातच राहत असते. नेहमीप्रमाणेच सचित, सिद्धार्थ, हेमंत आणि मौलिक हे त्या चार जणींच्या प्रेमात पडतात आणि कथा नेहमीच्या वळणाने जायला लागते. मात्र अचानक एक दिवशी भरतचे बिंग फुटते. बहिणीच्या आजारपणासाठी आणि भाचीच्या शिक्षणासाठी हे सर्व केल्याचे भरत सांगतो आणि सचितची क्षमा मागतो. मोठ्या मनाने सचित त्याला माफ करतो आणि इथे असे पर्यंत भरतला बहीण आणि भाची समोर खोटे न पाडण्याची जबाबदारी घेतो. त्यानंतर ह्या चौघा जणांच्यात थोड्याश्या नेहमीच्या रुसव्या फुगव्यानंतर प्रेमाचे अंकुर फुटायला सुरुवात होते आणि अचानक एक दिवशी सचित आपण हा बंगला विकणार असल्याचे जाहीर करतो.




ह्यानंतर कथा नेहमीचेच वळण घेते का अजून काही अनपेक्षित घडते ? हे चित्रपटातच बघण्यात मजा आहे.
अभिनयाच्या आघाडीवर भरत जाधव, सिद्धार्थ, सचित पाटील अप्रतिमच. जिजिच्या भूमिकेत शुभांगी गोखले नेहमीप्रमाणेच यशस्वी खेळी खेळून गेल्या आहेत. हेमंत ढोमे, मैलिक भट, कादंबरी कदम, पुजा जाधव आणि मनवा नाईक आपापली कामे व्यवस्थित पार पाडतात. मुख्य म्हणजे कुठेही लाउड अभिनय जाणवत नाही. भरत जाधवने त्याच्या वाटेला आलेले हळवे प्रसंग अतिशय सुरेख उभे केले आहेत, त्याबद्दल त्याला विशेष दाद द्यायला लागेल. सोनाली कुलकर्णी दिसली आहे छान आणि अभिनयात देखील उत्तम. चित्रपटात खटकलेली एकमेव गोष्ट म्हणजे अलिबागच्या निसर्गसौंदर्याचा १०% सुद्धा वापर चित्रपटात करण्यात आलेला नाही.


तर मग कधी घेताय 'क्षणभर विश्रांती' ?

अल्लाह के बंदे

|
बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.



नसिरुद्दिन शहा, अतुल कुलकर्णी, सुहासिनी मुळे, विक्रम गोखले, झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी, रुखसार, सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज. चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या. ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे.

मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात (का शर्टात? ) निराशाच पडली. अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी ५ मिनिटांच्या वर भरणार नाही. सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही. सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून. एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही, बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे. नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत 'दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या 'के के' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मिळतीजुळती कसली? आपण 'के के' लाच पाहत आहोत असे वाटत राहते.



असो...

तर आता मूळ कथेकडे वळू. विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या 'भुलभुलय्या' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र, सख्खे भाऊच म्हणाना. आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते. तिचाच मुलगा म्हणजे विजय. शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम. बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत. रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी, विषारी दारू, चरस, लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि 'भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे.

तर ह्या दोघा जय-विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो. अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात. त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात. आपल्याच वयाच्या चार/पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात. वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा न देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते, त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो. जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात. इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो.



चोरी, खून, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते. बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २०-२२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि 'के टी' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात. जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते. ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा.

भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते. केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते. ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते. एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 'के टी' चा खून करतात. खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते, ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते. एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात.



काही वर्षात (म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात. जुना मित्र रमेश (झाकीर हुसेन) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात. घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो. ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे (अतुल कुलकर्णी) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही. अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे. इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ... आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते.



ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या (अंजना सुखानी) चे आगमन, हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते. चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास!!



विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे. कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते. याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे. हा याकुब, हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो. गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला, विकृत हसणारा, बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे. अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही.

तात्पर्य काय तर 'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. '



कॅटवूमन

|


स्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळेच कॅटवूमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्स मधून भेटिला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती २००४ साली वॉर्नर ब्रदर्सच्या 'कॅटवूमन' चित्रपटातून. कॅटवूमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट. टायटल्स पासून बघण्यालायक जे काही मोजके चित्रपट असतात त्यातलाच हा एक चित्रपट.

चित्रपट काही फार भव्य, साहसाने ठासून भरलेला असा नाही, पण एका सामान्य तरुणीचा कॅटवूमन पर्यंत होणारा प्रवास अतिशय छान चित्रित केलेला आहे. हेली बेरी, शेरॉन स्टोन, बेंजामिन ब्रॅट ह्या सारख्या कलाकारांनी अभिनयाची बाजू अतिशय सुंदर सांभाळलेली आहे. पेशन्स फिलिप्स (हेली बेरी) हि सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असते. लाजऱ्या बुजऱ्या पेशन्स फिलिप्सवर ह्यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या कंपनीच्या नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्टची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. पेशन्स देखील ह्या संधीचे सोने करण्याचा तयारीने काम करत असते.

अशाच एका रात्री पेशन्सला आपल्या खिडकीखाली पहिल्यांदाच एका मांजरीचे दर्शन होते. सकाळी पुन्हा ती मांजर पेशन्सच्या खिडकीत हजर होते, ह्यावेळी मात्र ती खिडकीतून दर्शन देऊन सरळ वरच्या कठड्यावर चढते. इकडे मांजर बहुदा त्या उंच ठिकाणी अडकली असावी असे समजून पेशन्स तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात स्वतःचा जीव धोक्यात घालते. खिडकीच्या कडेला लटकलेल्या पेशन्सला बघून रस्त्यावरून जाणाऱ्या डीटेक्टिव टॉम लोनचा (बेंजामिन ब्रॅट) ती आत्महत्या करत आहे असा गैरसमज होतो. मात्र शेवटी तो तिला वाचवतो आणि त्याला सत्य देखील उमगते. पहिल्याच भेटीत तो ह्या साध्या सरळ मुलीकडे आकर्षित होतो.



एके रात्री उशीरापर्यंत काम पूर्णं केल्यावर पेशन्स स्वतःच आपली डिझाइन्स पोचवण्यासाठी गेलेली असताना तिला कंपनीच्या मालकाचे व इतर लोकांचे बोलणे कानावर पडते. नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये विषारी द्रव्ये असून ते त्वचेला हानिकारक व प्रचंड घातक असल्याचे तिला समजते. आता हे बोलणे कानावर पडलेली पेशन्स जिवंत राहणे हे कंपनीच्या फायद्यासाठी नुकसानकारक आहे हे ओघाने आलेच. त्यामुळे मालकाचे हस्तक कंपनीतून थेट समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाइपमध्ये अडकवून पेशन्सचा जीव घेतात.

पेशन्सचे प्रेत वाहत वाहत समुद्राच्या कडेच्या गाळात येऊन अडकते आणि इथेच चित्रपटाला वेगळे वळण लागते. पेशन्सच्या घराभोवती घुटमळणारे मांजर आता आपल्या बरोबर अजून काही मांजरे घेऊन तिथे हजर होते. सर्व मांजरे पेशन्सच्या प्रेताला घेरतात. पेशन्सच्या शरीरावर उभे राहून ते मांजर जणू पेशन्सच्या शरीरात पुन्हा प्राणच फुंकते... आणि खरंच पेशन्स पुन्हा जिवंत होते. हा पेशन्सचा कॅटवूमनच्या रूपातला पुनर्जन्म होतो. जिवंत झालेली पेशन्स डोळे उघडून आजूबाजूला पाहते आणि आपल्याबरोबर नक्की काय घडले होते ते आठवण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तिला काहीच आठवत नाही. जिवंत झाल्यानंतरची पेशन्सची पहिली हालचाल हि अगदी मांजरीसारखीचं दाखवली आहे, तर तिला दिसणारी आजूबाजुची दृश्ये, जमिनीखालील जाणवणारी हालचाल हे दृश्य अतिशय सुंदररीत्या पडद्यावर दाखवले आहे.



आपल्यात काहीतरी बदल घडला आहे हे पेशन्सला जाणवत असते, मात्र तो नक्की काय आहे हे तिच्या लक्षात येत नाही. सकाळी पुन्हा एकदा त्या रहस्यमय मांजरीचे पेशन्सकडे आगमन होते. आता मात्र पेशन्स तिच्या गळ्यातील बेल्ट मधून तीच्या मालकाचा पत्ता शोधून काढते व मांजर परत देण्यासाठी निघते. मिळालेल्या पत्त्यावर तिची भेट एका खूपश्या मांजरी पाळणाऱ्या आणि जुन्या इतिहासाच्या अभ्यासाचे वेड असणाऱ्या प्राध्यापिकेशी होते. तिच्याकडूनच ह्या रहस्यमय मांजराचे नाव 'मिडनाईट' असल्याचे समजते. प्राध्यापिका पेशन्सला मांजरांची इजिप्तमधील दैवत असलेली गॉडेस, तिची प्रतिरुपे आणि कॅटवूमन ह्या सर्वाबद्दल माहिती देते. ति पेशन्सला तिचा एक कॅटवूमन म्हणून पुनर्जन्म झाल्याचे सांगते आणि त्या रात्री घडलेल्या घटनांची आठवण करून देते. पेशन्स मात्र हे सत्य स्वीकारायला नकार देते.



साधी सरळ पेशन्स आणि कावेबाज कॅटवूमन ह्या दोन रूपांचे द्वंद आता पेशन्समध्ये सुरू होते. साहसाची, मुक्ततेची आवड असणारी कॅटवूमन पेशन्सला बेधुंद आयुष्याकडे ओढत असते तर दुसऱ्या बाजूला अल्लड पेशन्स डिटेक्टिव टॉम लोनकडे आकर्षली जात असते. कॅटवूमन ह्या प्रकाराबद्दल आता पेशन्स इंटरनेटवरून शक्य ती सर्व माहिती गोळा करते आणि वाचते. हळूहळू आता कॅटवूमन म्हणूनच जगण्याचे तिचे आकर्षण वाढत जाते. त्यातच एका रात्री बेदरकारपणे हिंडताना ते कॅटवूमनच्या रूपात एका सोन्याचे दुकान लुटणाऱ्या टोळीला बुकलून काढते. आता तर तिच्या आत्मविश्वासात दुपटीने वाढ होते. आपल्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय आता कॅटवूमन करते आणि एकेका खलनायकाच्या मागावर निघते.



शेवटी शेवटी ह्या सर्व प्रकरणामागे तिच्या कंपनीच्या मालकाच्या बायकोचा लॉरेलचा (शेरॉन स्टोन) हात असल्याचे उघड होते. मात्र कावेबाज लॉरेल स्वतः आपल्या पतीचा खून करते व त्याचा आळ कॅटवूमनवर आणते. इकडे पेशन्सची एकूण वागणूक, तिच्या स्वभावात होणारे बदल ह्यांनी अस्वस्थ असलेल्या टॉम लोनच्या त्रासात ह्यामुळे वाढच होते. आणि एका अनपेक्षित क्षणी तो पुराव्यानिशी पेशन्सला कॅटवूमन म्हणून अटक करतो. पुढे काय होते हे पडद्यावरच बघण्यात खरी गंमत आहे.



हेली बेरीच्या सुंदर अभिनयाने आणि शेरॉन स्टोनच्या सौंदर्याने लक्षात राहणारा हा चित्रपट. अल्लड, थोडा आत्मविश्वासाचा अभाव असणारी पेशन्स ते बेदरकार, रंगेल कॅटवूमन हा विविध शेडने रंगलेला प्रवास हेली बेरी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोठा छान पार पाडते. कपटी आणि कावेबाज लॉरेलच्या भूमिकेत शेरॉन स्टोन भाव खाऊनं गेली आहे हे सांगायला नकोच. एकूण काय तर वयाचा विसर पाडून मनमुराद आनंद लुटावा असा हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा.